Tuesday, June 16, 2015

'शिट्टी' गाजली, अन् वाजलीही.





वसई-विरारमध्ये पुन्हा 'ठाकूरशाही'.

     मिरा-भाईंदर म्हटले की गिल्बर्ट मेंन्डोंसा, उल्हासनगर म्हटले की पप्पु कलानी तसेच वसई म्हटले की हितेंद्र ठाकुर ही राजकीय समीकरणे च बनली आहेत. संपुर्ण राज्यभराचे लक्ष लागुन राहिलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या द्वितीय निवडणूकीचा आज निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडीला' जनतेने पुन्हा एकदा वसईच्या सत्तेच्या खुर्चीवर बसवले. ११५ पैकी तब्बल १०६ जागा मिळवत बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय प्रस्थापीत करत गड राखला आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. आजचा हा निकालही ऐतिहासीकच म्हणावा लागेल. ३ जुलै २००९ साली वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली  त्यानंतर २०१० साली महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत ८९ पैकी ६० जागा  जिंकत बहुजन विकास आघाडी ला स्पष्ट बहुमत मिळाले होते. बविआ च्या जिंकलेल्या उमेदवारांची ही आकडेवारी ६७% इतकी होती. मात्र २०१५ साली झालेल्या नविन प्रभाग रचनेनुसार एकुण जागांची संख्या ८९ वरून ११५ वर पोहोचली. गेल्या वेळचा रेकॉर्ड मोडुन काढत या निवडणुकीत बविआच्या विजयी उमेदवारांची आकडेवारी ९२% वर पोहोचलेली दिसते.
   गेल्या वेळ पेक्षा यंदा शिवसेनेने बविआ ला जोरदार टक्कर दिली होती. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक मुंबईतुन प्रचारासाठी दाखल झाले होते. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सुद्धा जंगी रोड शो झाला. तरीही शिवसेनेला अपेक्षीत यश मिळू शकले नाही.
     हितेंद्र ठाकुर यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे व मागील विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकुर यांच्या विरोधात पराभुत झालेले वसई चे माजी आमदार विवेक पंडीत हे ही प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत प्रचारापासुन दुर राहिले. याचाही फटका युतीला बसलेला आहे. तर अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप ला बसलेला आहे. मागील निवडणुकीत महापालिकेतुन ५३ गावे वगळण्याच्या मुद्यावर 'जनआंदोलन समितीच्या' अजेंड्याखाली सर्वपक्षीय गट बविआ विरूद्ध एकत्रीत आल्याचा फटका बविआ ला बसला होता. यंदा मात्र जनआंदोलन समितीत फुट पडली व अनेक प्रभागांमध्ये उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते. या निवडणुकीत कोणतीही रिस्क घ्यायची नाही या हितेंद्र ठाकुर यांच्या भुमीकेमुळे तसेच कायद्यानुसार महिलांना ५०% आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक दिग्गज व विद्यमान नगरसेवकांचे पत्ते यावेळी कापले गेले. तरीही कोणत्याही उमेदवाराने बंड पुकारून पक्षाला याचा फटका बसणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाकडुन घेतली गेली होती. यासाठी उमेदवारांची नावे देखील आयत्या वेळेत देण्यात आली होती. बविआ ला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
    गेल्या ५ वर्षांत केलेल्या विकासकामांचे दाखले देत केलेला प्रचार, त्यामध्ये असलेली नियोजन बद्धता, व विकासकामांची आश्वासने यांच्या जोरावर पुन्हा एकदा 'शिट्टी वाजली' आहे. आता विकास 'बहुजनांचा' होतो की 'स्वजनांचा' हे आगामी ५ वर्षांत दिसुन येईलच. पण हितेंद्र ठाकुर यांच्या नियोजनबद्धतेला खरी दाद द्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीत वसईतुन झालेला हितेंद्र ठाकुर यांचा विजय, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकुर यांचा नालासोपार्यातुन झालेला विजय व आता वसई-विरार महानगरपालिका निवडणूकीआधीच बिनविरोध निवडुन आलेल्या प्रविणा हितेंद्र ठाकूर याच महानगरपालिकेच्या संभाव्य महापौर असल्याने वसई विरार मध्ये 'पुन्हा ठाकूरशाहीच' आली असे म्हणावे लागेल.

प्रथमेश करजावकर.
१६-०६-२०१४

© Prathamesh Karjavkar.

Monday, June 1, 2015

"शहिदांना न्याय मिळणार तरी कधी"??














आज संपुर्ण दिवसभरात 'सौरभ कालिया' हे नाव बहुतेक न्युजचैनल्स वर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण कारगील युद्धाला आज १६ वर्षे पुर्ण होत आहेत. देशाचं रक्षण करताना आलेला तो एक दुर्देवी अंत. शहिद सौरभ कालिया यांचे भाऊ प्रा.वैभव कालीया यांच्या भेटीची आठवण शेअर करावीशी वाटते.
मे २०१० मध्ये आम्ही उत्तर भारत फिरण्यासाठी गेलो होतो. मनाली ते अमृतसर असा प्रवास करताना वाटेत हिमाचल प्रदेशातील पालमपुर हे एक निसर्गरम्य गाव लागते. १९९९ साली कारगील युद्धात शहिद झालेले कँप्टन विक्रम बात्रा आणि कँप्टन सौरभ कालिया हे याच गावचे सुपुत्र. पालमपुर गावातुनच आमची गाडी जाणार असल्याने आम्ही विक्रम बात्रा यांच्या घरी जाण्याचे निश्चीत केले. पालमपुर गावात प्रवेश करताच २ बाईकस्वारांना आम्ही गाठले आणि विक्रम बात्रा यांचे घर विचारले. कँप्टन विक्रम बात्रा यांच्या मातोश्रींनी पाणावलेल्या डोळ्यांनी बात्रा यांच्या आठवणी जाग्या केल्या. बात्रा यांचा गणवेश त्यांचा अस्थीकलश ह्या सर्व मन हेलावुन टाकणार्या आठवणी त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. बोलता-बोलतानाच कँप्टन सौरभ कालिया यांचे भाऊ वैभव कालिया यांच्याबद्दल सांगितले. त सध्या पालमपुर येथील एका विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तेथे पोहोचल्यावर प्रा.वैभव कालिया यांच्याबद्दल चौकशी केली प्रारंभी ते व्यस्त असल्याचे कळले. थोड्या वेळाने ते बाहेर येताच विद्यापीठाच्या एका कर्मचार्याने ते आल्याचे आम्हाला खुणावले. बाहेर येउन ते गाडीत त्यांच्या गाडीत बसले, ते कार सुरू करणार इतक्यातच आम्ही त्यांना गाठले. व "आप ही सौरभ कालिया के भाई है क्या" असे माझा दादा जयेश मिंडे याने त्यांना विचारले. सौरभ कालिया हे नाव ऐकताच वैभव कालिया हे ताडकन उठुन गाडीबाहेर पडले. पुढे त्यांनी "आप कौन और कैसे आना हूआ" ? असे विचारले व केवळ शहिद सौरभ कालिया यांच्या प्रेमापोटी भेटण्यास आलो आहोत हे ऐकुन त्यांनाही गहिवरून आले. शहिद कँप्टन सौरभ कालिया यांच्या बालपणीसह अनेक आठवणी त्यांनी जाग्या केल्या. नंतर त्यांनी घरी येण्यासाठी आग्रह केला मात्र आमच्या पुढील पुर्वनियोजीत दौर्यामुळे ते काही शक्य झालं नाही व आम्ही त्यांचा निरोप घेतला.
म्हणतात कि मरणानंतर वैर संपत मात्र कारगील युद्धातील या जाँबाज भारतीय वीरांच्या बाबतीत मात्र तसे घडले नव्हते. शरीरावर असंख्य भेगा, हाताची बोटे, नाक-कान कापुन हाल-बेहाल करून भारतीय सैनीकांना मारण्यात आले होते. अगदी यमराजही नाकारेल अशा अत्यंत छिन्नविच्छींन्न अवस्थेत या वीरांचे मृतदेह त्यावेळी भारतीय लष्कराच्या हाती लागले होते. दुर्दैवाने या शहीदांचे वयोवृद्ध आईवडील व कुटुंबीय हे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. निर्दयी पाकड्ये सैनीक मात्र यांना आम्हीच मारलं असं छातीठोकपणे सांगत आहेत. सध्या हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवला जावा यावरून वादविवाद सुरू आहेत. आजही कारवाई होउ शकते, गरज आहे ती केवळ राजकीय ईच्छाशक्तीची.

प्रथमेश करजावकर.
०२-०६-२०१५